समाजात सापांबद्दल गैरसमजच अधिक…!
सर्पमित्र, वन्यजीव रक्षक
अनंता घुगे/तालुका प्रतिनिधि/दिनांक/१९/०८/२०२३
समाजात सापांबद्दल समज पेक्षा गैरसमज च अधिक आहेत असे प्रतिपादन सर्पमित्र तथा वन्यजीव रक्षक राहुल साखरे व आदित्य इंगोले यांनी केले आहे. नागपंचमीचे औचित्य साधुन सापांबद्दल समज-गैरसमज तसेच सर्पदंश व्यवस्थापन व मानव वन्यजीव संघर्ष या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील लक्ष्मीचंद कनिष्ठ महाविद्यालयात आज(शनिवारी) ता.१९ रोजी करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सापांबद्दल विस्तृत माहिती यावेळी राहुल साखरे आदित्य इंगोले तसेच नयन राठोड यांनी दिली.
अन्नसाखळीतील महत्वाचा घटक असलेल्या सापांबद्दल फक्त नागपंचमीच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त न करता वर्षभर त्यांच्या बद्दल कृतज्ञ रहावे, साप व सर्पदंश म्हणजे मृत्यू नव्हे योग्य वेळी योग्य तो उपचार केल्यास मृत्यू टाळता येतो. निसर्गामध्ये असलेले सापांच महत्त्व यावेळी सर्पमित्र राहुल साखरे यांनी अधोरेखित केले. सापांबद्दल समाज मनामध्ये गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. त्यांना दुर करण्यासाठी नागपंचमीच्या निमित्ताने या जनजागृती कार्यक्रमाची सुरूवात केली आहे. यापुढे जास्तीत जास्त शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सापांबद्दल विस्तृत माहिती देण्याचा हा आगळावेगळा प्रयत्न आम्ही करणार आहो असे राहुल साखरे म्हणाले. सर्पमित्र तसेच आदित्य इंगोले यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना सापांच्या विविध प्रजातीची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. सर्वच साप विषारी नसुन ठराविक सापच हे विषारी आहेत. सापांच आढळस्थान, खाद्य तसेच सर्पदंश झाल्यावर करावयाच्या उपाययोजना याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता रुग्णास धीर द्यावा, सर्पदंश झाल्यास हालचाल करू नये, बाधित व्यक्तीला ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जावे. दंशाच्या वरच्या बाजूला घट्ट न बांधता आवळपट्टी चा वापर करावा.सर्पदंश बाधीत व्यक्ती ला कुठल्याही भोंदू बाबा अथवा तांत्रिकाजवळ नेऊ नये. सर्पदंश झालेल्या भागातुन तोंडाद्वारे विष काढण्याचा प्रयत्न करू नये. दंश झालेल्या भागी ब्लेड अथवा धारदार शस्त्राने मारू नये. यासोबतच कडुनिंबाचा पाला, मिरची खायला देऊ नये. साप डुक धरतो,साप बदला घेतो, नागमणी असतो, नागमणीने विष उतरते, साप दुध पितो, साप बीडच्या तालावर नाचतो हे सर्व गैरसमज असुन असे कुठलेही प्रकार सापाबाबत होत नाहीत. आपल्या आजुबाजूला साप अथवा जखमी वन्यजीव दिसल्यास घाबरून न जाता वनविभाग तसेच सर्पमित्र तथा वन्यजीव रक्षकांना पाचारण करावे असे आवाहन त्याने केले.यासोबतच वन्यजीव रक्षक नयन राठोड यांनी देखील वाढत्या मानव-वन्यजीव संघर्ष या विषयावर प्रकाश टाकला. मानव-वन्यजीव संघर्षात वनविभाग व वन्यजीव रक्षकांची भुमिका त्यांनी विशद केली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच प्राध्यापक व शिक्षकवृंद आदि उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिकेत इंगळे, बुध्दभुषण सुर्वे, शुभम हेकड, प्रविण गावंडे, ज्ञानेश्वर खडसे आदींनी परिश्रम घेतले.