डॉ. हरी नरके यांच्या निधनाने वाशीम जिल्ह्याला शोक
पुरोगामी, सत्यशोधकी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया
वाशीम,
दि. ९ : ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. हरी नरके यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वाशिम जिल्ह्यातील परिवर्तनवादी, बहुजन, सत्यशोधक चळवळीवरही शोककळा पसरली. दहा वर्षांपूर्वी वाशीमकरांनी स्थानिक शिवाजी शाळेत ग्रंथोत्सवामध्ये त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्या जुन्या आठवणींना यावेळी उजाळा मिळाला. या क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया..
सत्यशोधकी चळवळीचा खंदा नेता
प्रा. हरी नरके यांचे आज निधन झाल्याची बातमी आली आणि सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या समाप्ती महिन्यापूर्वीच सत्यशोधक चळवळीचा हा खंदा नेता गेला. महात्मा जोतीराव फुले साहित्याचा अभ्यासक, संशोधक, असा अकाली निघून जाण्याने सत्यशोधक चळवळीची मोठी हानी झाली असून ती कधीही भरून निघणार नाही. २००० साली अ.भा. सत्यशोधक समाजाच्या कार्यकारिणीत त्यांनी मुंबई विभागाचे सचिव म्हणून आणि मी विदर्भ विभागाचा सचिव म्हणून सोबत कार्य केले. त्यांच्या जाण्यामुळे सत्यशोधक चळवळीत निर्माण झालेली उणीव भरून काढणे शक्य नसले तरी त्यांच्या कार्याला प्रेरणा मानुन ही चळवळ गतिमान करणे, हीच त्यांना आदरांजली ठरेल.
सतीश जामोदकर माजी केंद्रीय अध्यक्ष,
सत्यशोधकी साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद.
========
पुरोगामी, वैचारिक मार्गदर्शक हरपला
ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनामुळे आंबेडकरी तथा सत्यशोधक चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या लेखणीतून फुले-आंबेडकरी विचारधारा सतत प्रज्वलित होत राहिली. ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि प्रभावी वक्ते होते. प्रा. नरके यांच्यामुळे नव्या फळीतील करून कार्यकर्त्यांना वैचारिक पाठबळ मिळायचे. वर्तमान परिस्थितीत महाराष्ट्राला त्यांची जास्त आवश्यकता होती. त्यामुळे हा पुरोगामी, वैचारिक मार्गदर्शक हरपल्याचे दु:ख मोठे आहे.
प्रा. गजानन वाघ संयोजक, हरी व्याख्यानमाला, वाशीम.
=========
ही चळवळीची खूप मोठी हानी
डॉ. हरी नरके यांच्या अकाली निधनाबाबत अतिव दुःख झाले. डॉक्टर हरी नरके यांनी सत्यशोधक चळवळीसाठी खूप मोठे साहित्यिक योगदान दिले आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे समग्र वाङ्मय आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे समग्र वाङ्मय इंग्रजी भाषेत प्रकाशित करून फुले दांपत्याचे कार्य जगभर पोहोचविण्याचे खूप मोठे कार्य त्यांनी केले. तसेच सत्यशोधक विचारांचे अनेक ग्रंथ सत्यशोधक चळवळीला समर्पित केली. व्याख्यान शिबिरातून त्यांनी सत्यशोधक चळवळीला मोठी दिशा देण्याचे कार्य केले. त्यांच्या अकाली जाण्याने सत्यशोधक चळवळीची मोठी हानी झाली आहे.
गजानन धामणे, जिल्हाध्यक्ष, सत्यशोधक समाज वाशीम
=========
ओबीसींचा लढवय्या नेता हरवला
डॉ. हरी नरके यांनी ओबीसीच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने लढा दिला. संपूर्ण राज्यभर त्यांनी ओबीसी मध्ये जागृती आणण्यासाठी आंदोलन उभारले. वाशिम शहरातही त्यांचे शिवाजी हायस्कूल येथे आम्ही व्याख्यान आयोजित केले होते. या माध्यमातून जिल्ह्यातील ओबीसी मध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली. सध्याचा अत्यंत वाईट काळ सुरू असून ओबीसींसाठी लढणारा खंदा नेतृत्वकर्ता अकाली गेल्यामुळे ओबीसींचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
– डॉ. रवी जाधव, ज्येष्ठ सामाजिक विचारवंत वाशीम
======
आम्ही निर्भीड लेखक गमावला
डॉ. हरी नरके हे सत्यशोधक विचारांचे निर्भीड लेखक होते. त्यांनी समस्त बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी आयुष्य खर्ची घातले. त्यांनी विविध ग्रंथांतून आणि व्याख्यानांतून, शिबिरांतून बहुजन समाजाचे प्रबोधन केले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीची मोठी हानी झाली आहे. डॉ. हरी नरके यांना भावपूर्ण आदरांजली.
प्रल्हाद पौळकर, ज्येष्ठ सत्यशोधक तथा पत्रकार, वाशीम