दोन महिन्यानंतर सेवानिवृत्त ग्रामसेवकाने पदभार सोपविला
शिरपूर ग्रामपंचायत मधील प्रकार, उद्याला होणार सुनावणी
शिरपूर
शिरपूर ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक अरुण इंगळे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर नवीन ग्रामसेवकाला त्यांनी पदभार दिला आहे. सेवा निवृत्ती नंतर दोन महिने त्यांनी ग्रामपंचायतचा कारभार सांभाळाला की काय? असा प्रश्न नागरिकांकडून बोलल्या जात आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत , शिरपूर जैन येथील तत्कालीन ग्रामसेवक अरुण इंगळे हे मे 2023 मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या जागी नवीन ग्रामसेवक संजय घुगे यांची गटविकास अधिकाऱ्यांनी शिरपूर ग्रामपंचायत च्या ग्रामसेवक पदी नियुक्ती केली. मात्र तब्बल दोन महिन्यापासून सेवानिवृत्त ग्रामसेवक यांनी नवीन ग्रामसेवकाकडे पदभार दिला नव्हता . मग दोन महिन्यापासून सेवानिवृत्त ग्रामसेवकांनी शिरपूर ग्रामपंचायतचा कारभार पाहला की काय? गावामध्ये आशा तर्कवितर्काना उधाण आलेले असून ग्रामसेवकाच्या या कारभाराची गावातील काही सुजाण नागरिकांनी संबंधीत विभागात तक्रार दिली व या प्रकरणी उदया सुनावणी सुद्धा होणार आहे तर गट विकास अधिकारी यांनी या आधीच कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. एकूणच संबंधित ग्रामसेवकाच्या अडचणी वाढल्याची चर्चा दिवस भर गावात सुरू होती.
तर याच ग्राम सेवकावर शिरपूर ग्रा प मध्ये 26 लक्ष रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सुनावणी सुद्धा झालेली आहे.
तब्बल दोन महिन्यानंतर सेवानिवृत्त ग्रामसेवकाने नवीन ग्रामसेवकाला दि. 26 जुलै 2023 रोजी पदभार सोपवीला आहे. मात्र तब्बल दोन महिने पदभार न सोपविण्यामागचे काय गौडबंगाल होते? ग्रामपंचायतचे अनेक गुपिते या कारभारामध्ये बंद तर नाही झालीत ना? असे प्रश्न येथील नागरिकांच्या वतीने उपस्थित केल्या जात आहेत.
दि.26 जुलै रोजी ग्रामपंचायत हॉलमध्ये मासिक सभेचे आयोजन होते. या सभेमध्ये काही सदस्यांनी ग्रामपंचायत समोरील मोक्याची खुली जागा व इतर जागा गुपचूपपणे भाडे तत्वावर दिल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तत्कालीन सचिव अरुण इंगळे व सरपंच यांनी चुकीच्या पद्धतीने व सदस्यांना विश्वासात न घेता व कुठल्याही पद्धतीची माहिती न देता त्यांच्या जवळच्या निकटच्या व्यक्तींच्या नावे गावातील काही मोक्याच्या खुल्या जागा भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. याबाबत काही सदस्यांना तत्कालीन सचिव व सरपंचांनी अंधारात ठेवून सदर बाब केली असल्याचा आरोप काही सदस्यांनी मासिक सभेमध्ये केला.व याच कारणामुळे तत्कालीन सचिवांनी दोन महिने पदभार आपल्याकडेच ठेवला असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी तत्कालीन सचिव यांची चौकशी करून पदभार न सोपविण्यामागचे गौडबंगाल काय असावे याबाबतचा खुलासा करावा अशी मागणी जनतेमधून केल्या जात आहे.
ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यामागचे गौडबंगाल
जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत असल्याने व 17 सदस्य संख्या असल्याने येथे ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे असे असताना गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाची नियुक्ती का केली. असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून विचारला जात आहे