बहुजनांनो आपला राजकारणासाठी वापर होऊ देऊ नका !
- कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात प्रा. डॉ. अनिल राठोड यांचे प्रतिपादन
वाशीम : ( दि. 18 ऑगस्ट )
धर्मा – धर्मात, जाती-जातीत तसेच पोटजातींमध्ये सुद्धा गट तट निर्माण करून 85 टक्के असलेल्या ओबीसी एससी, एसटी आणि धार्मिक अल्पसंख्यांक बांधवांची विभागणी करून अल्पसंख्य लोकांना सत्तेत पाठविले जाते. आणि बहुजनांचा केवळ वापर केला जातो. कित्येक वर्षांपासून सुरू असलेला आपला वापर यापुढील निवडणुकांमध्ये बहुजनांनी होऊ देऊ नये असे प्रतिपादन समनक जनता पार्टीचे मार्गदर्शक प्रा. डॉ. अनिल राठोड यांनी केले.
स्थानिक पत्रकार भवन येथे दि. 16 ऑगस्ट रोजी समनक जनता पार्टीच्या वतीने एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. राठोड बोलत होते. यावेळी विभागीय महासचिव प्रा. अनिल बळी, जिल्हाध्यक्ष गजानन धामणे, शहराध्यक्ष रवींद्र उर्फ राजू काळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ. राठोड म्हणाले की, राज्यात ओबीसींची जनसंख्या आज घडीला 60 टक्के च्या वर आहे. सोबतच एससी, एसटी, तसेच जैन, बौद्ध, मुस्लिम व इतर धार्मिक अल्पसंख्याकांची संख्या विचारात घेतली तर ती 85 टक्केच्याही वर जाते. मग असे असतांना उरलेल्या 15 टक्के समाजातील लोक सत्तेत केंद्रस्थानी कसे काय जातात हे समजून घेण्याची गरज आहे.
आपले काही समाज बांधव सत्तेत सहभागी होतांना दिसतात. मात्र, ते आपल्या सामाजिक समस्यांवर लढताना कधीच दिसत नाहीत. याच्या मुळाशी गेलो तर ते आपल्या मतांमुळे निवडून गेले असले तरी ते आपले हित कधीच न पाहणाऱ्या मालकांच्या पक्षाचे खांदेकरी झालेले असतात आणि त्या त्या पक्षांचा व्हीप आदेश ते पाळत असतात. त्यामुळेच त्यांच्याकडून आपली मोठी फसवणूक सातत्याने होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून अशीच आपली बहुजनांची फसवणूक होत आहे. आपल्या मतांचे ध्रुवीकरण करून आपली मते विभागून सातत्याने आपला वापर केला जात आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. यासाठीच समस्त बहुजनांनी एकजूट होऊन दलालांना दूर ठेवून योग्य पक्ष व योग्य व्यक्तींना पुढे करून राजकीय बदल घडविला पाहिजे असे डॉ. राठोड म्हणाले.
यावेळी प्रा. अनिल बळी यांनी समाजात जाऊन समाजाचे प्रबोधन करण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची गरज असते त्यामुळेच समनक जनता पार्टीच्या वतीने अशा प्रकारचे शिबिर घेतले जात असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देऊन कार्यकर्त्यांनी समाजाचे प्रबोधन करण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांनी धर्म, राजकारण, शिक्षण, न्यायपालिका तसेच प्रचार प्रसार माध्यम आदी सत्तांच्या माध्यमातून इथली सत्ताधीश व्यवस्था बहुजनांचा कशा प्रकारे वापर करते याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. शिबिराचे प्रास्ताविक शहराध्यक्ष राजू काळे यांनी केले. यावेळी राजू लक्ष्मण इंगोले, सचिन परसराम गाभणे, विनायक सिद्धू काळे, हर्षल शरद काळे, नीरज मडके आदींनी पक्षप्रवेश घेतला. शिबिराचे सूत्रसंचालन यशवंत पवार यांनी केले. यावेळी बहुसंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते.