स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला निवाऱ्यासाठी दिव्यांगांचे आमरण उपोषण
वाशीम : स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनाची तयारी सुरू असताना मूलभूत गरजा ही पूर्ण न झालेल्या आणि राहण्यासाठी निवाराही नसलेल्या मंगरूळपीर तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथील दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 12 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे.
एकीकडे गरजू लोकांना हक्काच्या निवाऱ्यासाठी घरकुल योजना राबविली जाते. मात्र, खऱ्या गरजूंना या घरकुल योजनेचा लाभच मिळत नसल्याचे वास्तव आहे.
मंगरूळपीर तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथील बऱ्याच दिव्यांग बांधवांना राहण्यासाठी घर नाही तसेच शौचालयाचीही व्यवस्था नाही. त्यांना प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ देण्याची गरज असतांना प्रशासनाने आजपर्यंत ही त्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला नाही. याबाबत त्यांनी प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली आहेत. मात्र, आश्वासनापलीकडे त्यांना काहीही मिळाले नाही. सुखदेव रामेश्वर राठोड या दिव्यांग बांधवाच्या पुढाकारातून अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन 12 ऑगस्ट पासून उपोषणास बसण्याबाबत कळविले होते. या माध्यमातून अस्थिव्यंग व विधवा यांना घरकुलातील पात्र व अपात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे. जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्राम पंचायत व उत्पन्नातून पाच टक्के निधीतून भूखंड विकत घेऊन घरे बांधून देण्याबाबत विनंती करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने याची कुठलीही दखल न घेतल्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत आम्हाला घरकुलाचा लाभ मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नसल्याचे उपोषण कर्त्यांनी सांगितले.
ज्या लोकांकडे पक्के बांधकाम आहेत अशा लोकांना घरकुल मिळत आहेत. मात्र, आम्हा दिव्यांग बेघर बांधवांना जाणीवपूर्वक घरकुल पासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. या उपोषणात सुखदेव रामेश्वर राठोड, श्रीपाल राठोड, लता नामदेव जाधव, प्रवीण राठोड, राजाराम चव्हाण, शामराव राठोड, संजय जाधव, मयूर राठोड, सुखदेव जाधव,विनोद चव्हाण, किसन राठोड, गोविंद आडे, प्रेमसिंग चव्हाण, गणेश राठोड, अनुसया चव्हाण, शांतीबाई चव्हाण, सिंपल जाधव, बेबी राठोड, बेबी चव्हाण, शांतीबाई राठोड, राजेंद्र पवार, कविता राजेंद्र पवार, संतोष आडे, शामराव राठोड आदी दिव्यांग बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
पालकमंत्री संजय राठोड यांच्या गोर बंजारा समाजातील दिव्यांगांची अतिशय हाल अपेष्ठा होत असतांनाही याचे त्यांना काहीही सोयरसुतक नसल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला आहे.