पांगरखेडा येथे स्मशानभूमीची दुरावस्था
शेड अभावी मृतकाच्या नातेवाईकांचे हाल
शिरपूर : शिरपूर जैन येथून जवळच असलेल्या ग्राम पांगरखेडा येथे स्मशानभूमीची पार दुरवस्था झाली असून अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत शेड नसल्याने पावसाळ्यात गावात कुणाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नातेवाईकांना अगोदर स्मशानभूमीत टीन पत्राचे तात्पुरते शेड उभारावे लागते व नंतर मृत देहावर अंत्यसंस्कार करावे लागतात, तसे न केल्यास पावसाळ्याच्या दिवसात अचानक पाऊस आल्याने जाळणारे सरण विझण्याच्या व मृतदेहाची विटंबना होण्याच्या घटना यापूर्वी सुद्धा घडल्या आहेत.
या प्रकरणी स्थानिकांनी वारंवार ग्रा.प.कडे व संबंधित प्रशासनाकडे मागणी केली परंतु उदासीन प्रशासन या कडे डोळेझाक करीत आहे. निदान पावसाळ्यात तरी मृतदेहाची विटंबना होऊ नये या साठी प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
माझ्या काकू चित्रलेखा बाई नत्थूजी यांचा कालदिनांक १८/०७/२०२३ रोजी मृत्यू झाला पाऊस सुरु असल्याने आम्हाला अगोदर तीन शेड उभारावे लागले नंतर अंत्यसंस्कार पार पाडावे लागले परंतु पाऊस व जोरदार हवा सुटल्याने सरण वारंवार विझत होते त्यामुळे आमचे खूप हाल झाले.
सुनील गावंडे, पांगरखेडा